सांधे दुखी आणि आयुर्वेद (भाग १)

    Date : 25-Jun-2020
|

                                             Arthritis and ayurved_1&n      

   सांधे दुखी आणि आयुर्वेद (भाग १)

                                                                                                                 
                            वैद्य विजय कुलकर्णी, नाशिक

                                                       मो-९८२२०७५०२१

कारणे आणि स्वरूप-

          ‘ वातव्याधी ‘ हा एक रोगसमूह आहे. वातदोषामुळे शरीरामध्ये निर्माण होणारे वेगवेगळे विकार किवा व्याधी असे या वात व्याधीचे वर्णन करता येईल.हिवाळ्यामध्ये अनेक जणांना वातव्याधीचा त्रास होतो.यामध्ये ‘ संधीवात ‘ हा सर्वसामान्यपणे आढळून येणारा एक विकार आहे. या रोगाने ग्रस्त असणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही अतिशय चिंतेची बाब होऊन बसली आहे.

        संधिवात आणि आयुर्वेद चिकित्सा यांचे नाते अतूट आहे असे म्हणता येईल. कारण आयुर्वेदाने संधीवातावर सागितलेल्या विवध उपाययोजना या लाभदायक ठरू शकतात असा एकंदरीत अनुभव आहे.या संधिवाताच्या कारणांचा, लक्षणाचा आणि चिकित्सेचा अतिशय सखोल विचार आयुर्वेदशास्त्राने केलेला आढळून येतो.

          ‘सांधेदुखी’ हे प्रमुख लक्षण असणाऱ्या या संधिवाताचे स्वरूप अनेकदा भयंकर रूपही धारण करू शकते हे अनेकांना ठाऊक असेल. असा आजार आपल्याला होऊ नये म्हणून काय करावे, असा प्रश्न अनेकजण विचारतात, तसेच ज्यांना याचा त्रास आहे अशांना त्यापासून मुक्तीसाठी काय करावे असा साहजिकच प्रश्न पडतो. या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आयुर्वेदीय दृष्टीकोनातून केला आहे.

‘संधिवात’ हा अतिशय श्रम करणाऱ्या व्यक्तींमध्ये हमखास आढळतो. वाजवीपेक्षा व्यायाम करणाऱ्यांना यांचा त्रास होण्याची शक्यता असते.

    सायकलसारख्या वाहनावरून जास्त काळ प्रवास केल्यानेही गुडघे,घोटे यांचे सांधे त्रास देण्यास सुरुवात करतात.अतिशय कोरडे, थंड असे अन्न सेवन करणाऱ्यांमध्ये हा त्रास आधिक्याने आढळतो.उदा-सतत शेव कुरुमुरे फरसाण,ब्रेडसारखे पदार्थ, डाळीच्या पिठाचे पदार्थ अशा प्रकारचा आहार असणाऱ्यांना संधिवाताचा त्रास होऊ शकतो.वजन अतिशय वाढल्याने पायांवर भार येऊन पायांचे सांधे दुखू लागतात.

    अतिशय जागरणाची नेहमी सवय असणाऱ्या व्यक्ती देखील बऱ्याचदा संधिवातासारख्या वातविकारांचे लक्ष्य ठरतात. कारण जागरणाने शरीरातील कोरडेपणा वाढून वायूचा प्रकोफ होतो.

वृद्धापकाळामध्ये संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते कारण शरीराची झीज अधिक गतीने होण्याचा हा काळ असतो.

अतिशय कृश (बारीक) असणाऱ्या व्यक्तींनाही सांधेदुखी बेजार करून टाकते.सतत थंड प्रदेशात, थंड पाण्यात काम करणारी मंडळी या संधीवाताने त्रस्त होतांना दिसतात.

   हा संधीवात किती तीव्रतेचा आहे हे तो कोणत्या कारणाने निर्माण झाला आहे यावरही बऱ्याच अंशी अवलंबून असते. शरीरातील विविध धातूंची होणारी झीज आणि त्यामळे होणारा ‘वायू’ या दोषांचा प्रकोफ हे या संधीवाताचे मूळ कारण ठरते.वायूचा प्रकोफ घडवणारी अनेक कारणे वर विशद केली आहे.

  सांध्याच्या ठिकाणी होणारी झीज ही या संधीवाताला उत्पन्न करते.झीज झाल्यास सांध्याच्या ठिकाणी कटकट असा आवाज येतो, विशेषतः गुडघ्यांच्या ठिकाणी हे विशेषत्वाने जाणवते.

 अशा प्रकारे संधेदुखीची कारणे समजून घेतल्यावर या सांधेदुखीच्या स्वरूपाविषयी महत्वाची माहिती पाहणे उचित ठरेल.

 या सांधेदुखीमध्ये आयुर्वेदानुसार मुख्य व्याधींचा विचार केला जातो.तो म्हणजे निव्वळ  ‘संधीवातआणि दुसरा ‘आमवात’ या दोन्हीच्या स्वरुपात भिन्नता असते. त्यांच्या चिकित्सेमध्ये फरक करावा लागतो. आणि त्यासाठी योग्य व्याधीनिदान होणे क्रमप्राप्त ठरते. संधीवात हा बर्याचदा वृद्धपणी होतांना आढळतो.यामध्ये सांध्यांमधील विशिष्ट घटकांची झीज होत असल्याने सांध्यांच्या ठिकाणी तीव्र वेदना निर्माण होतात. सांध्यांची हालचाल करणे अवघड होते. सांध्यांवर कधी सूज असते तर कधी नसते. सांध्यांच्या ठिकाणी वातदोषाचा संचार वाढल्याने तेथे कोरडेपणा निर्माण होतो. तेथील प्राकृत स्निग्धता यामुळे कमी होते.अनेकदा शरीराची हालचाल यामुळे मर्यादित होते. थंड वातावरणात  हा त्रास वाढण्याची शक्यता असते. यामुळे बेचैनी निर्माण होते. सांधे काहीवेळा जखडल्यासारखे वाटतात.

‘ आमवात ‘ या विकाराचे स्वरूप यापेक्षा थोडे वेगळे असते. यामध्ये सांधे सुजतात .विशेषतः मोठे सांधे आधी सुजतात.लहान संध्यानाही सूज येते. यामधील वेदना ही संचारी स्वरुपाची असते म्हणजेच आज एक सांधा त्रास देतो तर उद्या दुसराच त्रास देतो.यामध्ये सांध्याच्या ठिकाणी उष्ण स्पर्श जाणवतो अंगातही मंद ताप असतो. सांधे जखडून जातात. शरीराची हालचाल करणे अवघड होते.

या दोन्ही विकारांमधील लक्षणांमध्ये असा फरक असतो.या दोन्हीचे योग्य निदान करणे हे आवशक असते. हे सविस्तर सांगण्याचा येथे उद्देश असा की असे त्रास होत असतांना सांधेदुखी नेमकी कशामुळे आहे. संधीवातामुळे की आमवातामुळे  हे सामान्य माणसाला समजत नाही आणि येथे वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असते. अनेकदा सांधेदुखीवर काही सामान्य उपचार सांगोवांगी अनेकजण माहिती करून घेतात. आणि स्वतःचे स्वतः उपचार करू पाहतात. संधीवात आणि आमवात या दोहोंच्या उपचारामध्ये फरक आहे. संधीवातामध्ये तेल सांध्याला लावल्यावर बरे वाटते तर आमवातात तेच तेल त्रासदायकही ठरू शकते. अमावातामध्ये तेल न लावता शेक घ्यावा लागतो तर संधीवातामध्ये तेल लावून शेक घेतल्यास उत्तम उपयोग होतो.

  सांधेदुखीच्या उपचारासंदर्भात अनेक गोष्टीचा उहापोह सविस्तरपणे करणे आवश्यक आहे, याची माहिती आता आपण करून घेऊ.

चिकित्सेपूर्वी निदान महत्वाचे:-

         कोणत्याही रोगाची चिकित्सा जाणून घेण्यापूर्वी त्या रोगाचे नीट निदान होणे आवश्यक ठरते. संधीवात आणि आमवात या दोन्ही रोगांमध्ये चिकित्सा भिन्न असते.त्यामुळे सांधेदुखी या दोनपैकी कशामुळे आहे हे जाणून घ्यावे लागते. आणि त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक ठरतो.वैद्य आपल्या अनुभवाने हा भेद जाणून त्यावर योग्य ती चिकित्सा करतात.

        संधीवाताचा उपचारम करतांना वात दोषांचा विचार सर्वप्रथम करावा लागतो.या वातावर ‘ तेल ‘ हे उत्तम औषध आहे असे आयुर्वेदाने सांगितले आहे.तेल हे वातदोषावरील ( म्हणजेच वातदोषामुळे शरीरात होणाऱ्या विविध विकृतीवरील) परमं म्हणजेच श्रेष्ठ औषध आहे असे ‘ वाग्भट ‘ या विद्वान आयुर्वेदीय ग्रंथकाराने सांगितले आहे.  ( आपण खूप थकल्यामुळे आपले पाय दुखत असतील तर पायांना तेलाने मालिश केल्यास पाय दुखणे थांबते  असा आपणापैकी अनेकांचा अनुभव असेल.) तेव्हा संधिवातावरील सांधेदुखीवर बाहेरून तेल लावणे हा एक प्रमुख उपचार होय.यासाठी तिळाचे तेल अतिशय उपयुक्त ठरते.त्याचप्रमाणे तीळ तेलाचा बेस म्हणून उपयोग करून नारायण तेल,महानारायण तेल, वातनाशक तेल, अभ्यंग तेल, अश्वगंधादि तेल, निर्गुडी तेल,अशा विविध तेलाचा उपयोग वेगवेगळ्या अवस्थांनुसार वैद्यकीय सल्ल्याने करता येतो.

  ‘ आमवात ‘ या व्याधीमध्ये ( ज्यामध्ये सांध्याच्या ठिकाणी सूज असते, गरमपणा असतो, विंचू चावाल्यासारख्या वेदना असतात, थोडा ताप असतो, सांधे जखडून जातात) मात्र अशा तेलांचा उपयोग होत नाही,उलट त्रास वाढून वेदना वाढण्याची शक्यता असते. म्हणून सांधेदुखी ही संधीवातामुळे आहे की आमवतामुळे आहे हे समजणे महत्वाचे आहे. म्हणूनच सांधेदुखी सुरु झाली की तेल लावा असा सर्वसाधारण समज आढळतो, तो तितकासा बरोबर नाही हे वरच्या वर्णनावरून लक्षात आले असेलच

   सांधेदुखीवर दुसरा महत्वाचा उपचार म्हणजे ‘ शेक ‘ घेणे हा होय.यालाच स्वेदन असे म्हणतात.या स्वेदनामुळे म्हणजे शेकामुळे सांधेदुखीवर बराच आराम पडतो. हा शेक घेण्यासाठी गरम पाण्याची पिशवी,

गरम कपडा, गरम पाणी, गरम वाळूची पुरचुंडी, विटेचा गरम केलेला तुकडा अशी विविध साधने वापरता येतात. संधिवातात आणि आमवातात वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये फरक असतो. संधीवातात घ्यावयाचा शेक हा स्निग्ध शेक असतो. म्हणजे यामध्ये सांध्याच्या ठिकाणी तेल  लावून त्यावर गरम पाणी ओतणे, गरम पाण्याच्या पिशवीने किवा गरम कपडयाने शेकणे हे अभिप्रेत असते. आमवातात मात्र रुक्ष शेक अपेक्षित असतो. म्हणजे यामध्ये तेल न लावता शेक घ्यावा लागतो. शेकण्यासाठी वाळू गरम करून तिची पुरुचुंडी करून त्याचा शेक घ्यावा लागतो.किंवा विटेचा तुकडा गरम करून त्याचा शेक घ्यावा लागतो. बाहेरून तेल लावणे किंवा न लावणे, तसेच शेक घेणे हे सांधेदुखीवर बाहयोपचार झाले.सांधेदुखीवर शरीरांतर्गतही काही उपचार करणे आवश्यक ठरते.यामध्ये ‘ पंचकर्म ‘ या वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदीय चिकित्सेचा खूप उपयोग होतो. या पंचकर्मांपैकी ‘ बस्ती ‘ हा उपक्रम या सांधेदुखीवर फायदेशीर ठरतो. या उपक्रमामध्ये गुदुद्वारावाटे काही औषधी तेल किंवा काढे आतल्या आतड्यापर्यंत पोहोचवले जातात. वातदोषांच्या नियांणासाठी याचा अप्रतिम उपयोग होतो असे आढळते.प्रत्यक्षातही अनेक वैद्य या बस्तीचा अवलंब करतात. शरीराच्या कोणत्याही भागात मधूनमधून होणाऱ्या वेदना या बस्तीचिकित्सेमुळे कमी होतात.

    बस्तीप्रमाणेच ‘ सौम्य वेरचन ‘ हे देखील बऱ्याचदा वातदोषामुळे होणाऱ्या व्याधिंवर उपयुक्त ठरते. बस्ती, विरेचन हे चिकित्सा उपक्रम अर्थातच वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच करून घ्यावे.

पोटात घ्यावयाची औषधे-:

     सांधेदुखीवर पोटामध्ये काही आयुर्वेदीय औषधांची अंमलबजावणी केल्यास त्याचाही फायदा दिसतो.’गुग्गुळ’ हा पदार्थ या संदर्भात अतिशय औषधी आहे सांधेदुखी म्ह्टली की गुग्गुळाच्या गोळया घ्या असे बरेच जण दुसऱ्यांना सांगत असतात. गुग्गुळ म्हणजे एका वनस्पतीचा निर्यास असून या गुग्गुळाची शुद्धी करून मगच तो औषधांमध्ये वापरावा लागतो. या गुग्गुळामध्ये इतर वेगवेगळी औषधी द्रव्ये घालून त्यांची अनेकविध मिश्रणे बनवली जातात. या प्रत्येक मिश्रणाला वेगवेगळी नावे आहेत. योगराज गुग्गुळ, कैशोर गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ, इ.या प्रत्येक गुग्गुळाचा उपयोग सांधेदुखीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये नीट विचारपूर्वक करावा लागतो.  (अर्थातच वैद्याच्या सल्ल्याने.)