आम्लपित्त आणि आयुर्वेद

|

आम्लपित्त आणि आयुर्वेद

वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

मो. ९८२२०७५०२१

डॉक्टर, मला पित्ताचा खूप त्रास होतो. काहीतरी कायमचा उपाय सांगा हो, असे सांगत अनेक रुग्ण वैद्याकडे येतात. छातीत होणारी जळजळ, तोंडाला येणारे कडवट, आंबट असे पाणी, सतत होणारी मळमळ आणि तीव्र डोकेदुखीने ग्रस्त असलेले हे रुग्ण आम्लपित्त या रोगाने अत्यंत त्रासून जातात. उलटी होऊन गेल्यावर मग या रुग्णांना बरे वाटते. काहीजणांना तर घशात बोटे घालून उलटी करावी लागते.

आपल्या शरीरामध्ये श्वसनसंस्था, मज्जासंस्था, पचनसंस्था अशा विविध संस्था कार्यरत असतात. त्यातील पचनसंस्थेअंतर्गत येणारा आम्लपित्त हा व्याधी आहे. आयुर्वेदीय शास्त्राने त्याचे स्वतंत्र रोग म्हणूनही वर्णन केलेले आहे. शरीरामधील पित्त या दोषाच्या विकृतीमुळे निर्माण होणारा हा रोग अनेक व्यक्तीना त्रस्त करीत आहे, आजच्या धावपळीच्या युगामध्ये तर हा त्रास असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. असे का घडते? याची कारणमीमांसा नीट समजून घेतली पाहिजे.

आम्लपित्ताची कारणे :

अतिशय तिखट, मसालेदार, चमचमीत जेवण करणे, अतिशय आंबट खाणे, अतिप्रमाणात चहापान करणे, मोठया प्रमाणावर केलेले मद्यपान, तंबाखूच्या सेवनाचे वाढते प्रमाण, मांसाहाराचे वाढत चाललेले प्रमाण, अतिजाग्रण, जेवणाच्या वेळेत असणारा अनियमितपणा, भूक लागलेली असताना आहार न घेणे, मानसिक चिंता अशी कारणे सतत घडत गेल्यास व्यक्ती आम्लपित्ताकडे वाटचाल करू लागते.

इंग्रजीत यालाच हायपरअसिडीटी असे म्हटले जाते. आपल्या पचनसंस्थेत मुख, अन्ननलिका, जठर लहान आतडे, मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत. यापैकी जठराशी संबंधित असणारा आम्लपित्त हा व्याधी वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर रूप धारण करू शकतो.

आपल्पिताची लक्षणे :

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तीव्र वेदना डोकेदुखी, घशाशी होणारी जळजळ, तोंडाला आंबट, कडवट पाणी येणे, उलटीची भावना होणे ही आम्ल्पित्ताची सामान्य लक्षणे होत. काहीवेळा यामध्ये आंबट व करपट ढेकर येणे ही देखील तक्रार असते.

या सर्व लक्षणांचा आयुर्वेदाने आपल्या ग्रंथामध्ये बारकाईने उल्लेख केलेला आहे. आम्लपित्तामध्ये पित्तदोषाचा उष्ण गुण वाढतो, त्याच्या उष्ण गुणांमुळेच छातीती जळजळ होत असते. या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष केल्यास पुढे जठराच्या ठिकाणी व्रण निर्माण होण्याची शक्यता असते. याला अल्सर असे म्हणतात. अल्सर हा अत्यंत तापदायक असा प्रकार आहे. म्हणून आम्लपित्ताकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

प्रतीबंधात्मक उपाय :

वर सांगितलेली एकूण लक्षणे वाचल्यावर आम्लपित्त आपल्याला होऊच नये, असे सर्वाना वाटेल. अनेकांनी त्रस्त रुग्ण पाहिलेले असतील. त्यामुळेही आपल्याला यापासून मुक्तता हवी असेच त्यांना मनापासून वाटत असेल, अशा सर्वानी आम्लपित्ताची वर सांगितलेली सर्व कारणे आपल्या बाबतीत घडणार नाहीत, याची जरूर काळजी घ्यावी. आपली दिनचर्या नियमित ठेवावी. आपला स्वभाव रागीट तसेच खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे. व्यसनांपासून सदैव दूर रहावे.

ज्यांना अम्लपित्ताचा त्रास नेहमी होतो अशांनी देखील वर सांगितलेल्या कारणांपैकी आपल्या बाबतीत कोणती कारणे घडताहेत याचा पडताळा घेऊन ती कारणे पुढे घडणार नाहीत, अशी व्यवस्था करावी, रोगाची कारणे शोधून ती टाळण्याचा प्रयन्त करणे हा प्रत्येक रोगाच्या उपचारामधील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. म्हणून आयुर्वेदीय चिकीत्सापध्दतीमध्ये रोगांच्या कारणानां खूप महत्व आहे.

अम्लापिताच्या काही रोग्यांना सोडा पिण्याची सवय आढळते. सोड्यामुळे वाढलेल्या पित्ताचे तात्पुरते उदासीणीकरण होऊन तात्पुरते बरे वाटते. पण ही सवय लावून घेणे चांगले नाही. यापेक्षा अधिक पित्ताची निर्मिती होणे कसे टळेल? याकडेच अधिक लक्ष पुरविले पाहिजे.

साजूक तुपाचा वापर हवा :

आम्लपित्ताच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर भरपूर प्रमाणात करावा. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होतो. शतावरी, जेष्ठमध, दुर्वा या वनस्पती द्रव्यांचा वापर वैद्याच्या सल्ल्याने केल्यास आम्लपितामध्ये लाभ होतो.

आम्लपिताचा नेहमी त्रास असणाऱ्यांनी मोरावळा खाण्यामध्ये ठेवावा. (आवळ्याच्या मोसमामध्ये आवळा आणि साखरेचा पाक यांचा उत्तम संयोग असलेला हा मोरावळा तयार करून ठेवावा.) आवळा हा थंड गुणधर्माचा, पित्तशामक असल्याने त्याचा आम्लपितामध्ये उत्तम उपयोग होतो.

आयुर्वेदातील पंचकर्मापैकी वमन आणि विरेचन या दोन कर्मांचा, आम्ल्पितामध्ये चांगला उपयोग होतो. सुठ आणि साखर यांचे मिश्रण, कामधुधा,लघुसुतशेखर, सूतशेखर अशी काही आयुर्वेदीय औषधे योग्य सल्लाने घेता येतात.