साखर अजिबात नको – हा मोठा गैरसमज…!

    Date : 16-Jan-2026
|

No sugar at all
 
वैद्य विजय कुलकर्णी
आयुर्वेद तज्ञ, नाशिक
 
सध्या साखर किंवा गूळ अजिबातच खाऊ नका किंवा गोड पदार्थ देखील शक्यतो टाळा अशा प्रकारचा एक मेसेज सर्वत्र सोशल मीडियावर देखील पसरविला जात आहे. पण खरे पाहता मधुमेही तसेच काही स्थूल व्यक्ती यांचा अपवाद वगळता इतरांनी मात्र रोज थोडे तरी गोड पदार्थ आपल्या आहारात ठेवायला हवेत. यात कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही. याचे कारण गोड चवीचे पदार्थ हे आपल्या शरीराला आवश्यक असतात. मेंदूला योग्य तो ग्लुकोजचा पुरवठा झाला नाही तर त्याने आपल्या मेंदूचे कार्य नीट चालू शकत नाही. त्याच बरोबर आपली त्वचा, आपले डोळे, आपले केस आपली स्मरणशक्ती आणि अशा अनेक अवयवांसाठी देखील गोड पदार्थ हे आवश्यक असतात. या पदार्थांमुळेच आपल्या शरीरात योग्य ती ऊर्जा निर्माण होते.
 
प्रत्येक व्यक्ती आणि प्रकृती परत्वे हे गोड पदार्थ रोज किती प्रमाणात खावे आणि कोणते खावेत याचे उत्तर व्यक्ती व प्रकृती परत्वे अवलंबून असते. प्रत्येकानेच अमुक इतके ग्रॅम गोड पदार्थ खावे असा काही आरोग्याचा नियम दाखवता येत नाही पण कोणीही गोड पदार्थ खाऊच नये हे मात्र चुकीचे आहे. हा समज समाजामध्ये पसरल्यास त्याने आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. हे पक्के लक्षात ठेवावे. लहान मुलांना देखील थोडे गोड पदार्थ  खाऊ द्यावेत. अन्यथा त्यांची देखील वाढ बुद्धी, स्मृती यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. एक नक्की की हे गोड पदार्थ अति प्रमाणात मात्र खाऊ नयेत तसे केल्यास मात्र शरीराचे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. हे तारतम्य प्रत्येकानेच बाळगायला हवे. आणि मधुमेही आणि स्थूल व्यक्तींनी मात्र गोड पदार्थ टाळावेत हे देखील खरे आहे.
 
ayurvijay7@gmail. com;
Mo.: 9822075021