देवीचा आरोग्यदायी प्रसाद

|

                            देवीचा आरोग्यदायी प्रसाद

लेखक: वैद्य विजय कुलकर्णी

नाशिक

मो.9822072021 

      श्री दुर्गा देवीची सामुहिक आरती म्हटल्यावर तिला धूप, दीप आणि नैवद्य यांचे समर्पण केले जाते. धूप हा सुगंधी असतो त्याने वातावरण शुद्ध होते. दीप देखील वातावरणाची शुध्दी करतो आणि देवीला दिला जाणारा नैवद्य हा आपण प्रसाद रूपाने खाल्ला तर तो आपल्या शरीराचे पोषण करतो. देवीचा हा प्रसाद प्राधान्याने दुधानेयुक्त साजूकतुप असलेला आणि गोड चवीचा असा असतो. त्यामध्ये प्रामुख्याने दुधापासून बनवलेली खीर, केशरी भात, साठोरी, पुरणपोळी या पदार्थांचा समावेश होतो. खीर या शब्दामध्ये क्षीर असा संस्कृत शब्द आहे. दुधाला संस्कृत मध्ये क्षीर असे म्हणतात. सामान्यपणे खीर हि तांदूळ किंवा रवा किंवा शेवया किंवा गायीचे दुध, साखर, या पासून तयार करतात. हि खीर चवीला गोड असते. तिच्या सेवनाने पित्ताचे शमन होते, उष्णता कमी होते. आणि शरीराची पुष्टी देखील होते. केशरी भातात देखील अनेक पोषक गुणधर्म असतात. यामध्ये उत्तम प्रकारचा तांदूळ, साखर आणि थोडेसे केशर घालतात. त्यावर साजूक तुप घालून असा भात सेवन केल्यास हा भात देखील शरीराचे बळ वाढवतो. त्यामध्ये काजू, काळ्या मनुका हे देखील टाकता येतात. नवरात्रात सप्तमी, अष्टमीआणि नवमी असे शेवटचे तीन दिवस देवीला असा विशेष नैवद्य दाखवून वरील पदार्थ प्रसाद म्हणून वात्ल्र जातात. नवमीला बर्याच ठिकाणी पुरणाची पोळी तयार केली जाते. पुरणपोळी हे आपल्या महाराष्टातील विशेष असे खाद्य आहे. गुळ आणि साखर यापैकी एक गोड पदार्थ घालुण ती बनविली जाते त्याआधी पुरण तयार केले जाते. पुरणपोळी ही पचायला जड असते ती नीट पचावी म्हणून त्यावर गायीचे तुप टाकून मग खाण्याचा प्रघात आहे. ती देखील शरीराचे उत्तम पोषण करते. असा हा देवीचा आरोग्यदायी प्रसाद खाताना मधुमेही व्यक्तींनी योग्य ती काळजी घेऊन किंवा योग्य वैद्यकीय साल्यायानुसार त्याचे योग्य सेवन करणे आवश्यक आहे.